‘ते’ कोणत्या नशेत आहेत हे माहीत नाही ! : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गुवाहाटीत डांबून ठेवलेल्या आमदारांना जेवणातून अफीम, चरस, गांजा आदींसारखे अंमली पदार्थ दिले जात असल्याची चर्चा असून ते नेमके कोणत्या नशेत आहेत हे आपल्याला माहित नाही अशा शब्दांमध्ये आज खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर तोफ डागली. आमचा एकच बाप असला तरी त्यांचे शंबर बाप असल्याची टीका देखील त्यांनी केली.

खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी बंडखोरांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, आमचा बाप एकच आहे. त्यांचे बाब शंभर आहेत. कुणी दिल्लीत, कुणी, मुंबईत तर कुणी दिल्लीत ! त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा आमदारकी लढवावी. त्यांना हे आपले खुले आव्हान असल्याचे राऊत म्हणाले. बंडखोर आमदारांमध्ये अस्वस्थता असून अनेक जण आमच्या संपर्कात असून यातील काही जण नक्की परत येतील असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी त्यांनी भाजपवर देखील टीका केली. भारतीय जनता पक्ष या सर्व प्रकाराला खतपाणी घालत असल्याचे त्यांनी सांगितले. आसाममध्ये महापुरामुळे भयंकर स्थिती निर्माण झाली असतांना बंडखोर आमदार पार्ट्या झोडत असल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. आसामध्ये डोंगर, झाडी असली तर मग महाराष्ट्रात स्मशान आहे का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारला बदनाम आणि अस्थीर करण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी याप्रसंगी केला. तर आमदारांना डांबून ठेवले असून त्यांना जेवणातून अंमली पदार्थ दिले जात असल्याची चर्चा सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Protected Content