‘हा’ निर्णय आधीच का घेतला नाही ? : संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी | मोदी सरकार शेतकर्‍यांच्या एकतेनुसार झुकले असले तरी काळे कायदे मागे घेण्याचा निर्णय आधीच झाला असता तर सुमारे साडे चारशे शेतकर्‍यांचे प्राण वाचले असते अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर याची देशभरात प्रतिक्रिया उमटत आहे. याबाबत बोलतांना संजय राऊत म्हणाले की, शेतकरी आंदोलनाबद्दल सरकारची भूमिका आधीपासूनच आडमुठेपणाची होती. सरकारनं याआधी शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं. आंदोलकांना दहशतवादी, खलिस्तानी म्हटलं. आंदोलनात दहशतवादी घुसलेत म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली. शेतकरी अन्नदाता आहे. या देशाचा आत्मा आहे, याचा विसर सरकारला पडला. पण अखेर सरकारला शेतकर्‍यांपुढे झुकावं लागलं, असं राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, शेतकरी आंदोलनाच्या काळात ४५० हून अधिक शेतकर्‍यांचा जीव गेला. लखीमपूरमध्ये शेतकर्‍यांना चिरडून मारलं. हरयाणात शेतकर्‍यांवर लाठीमार झाला. मात्र त्या परिस्थितीतही शेतकरी मागे हटला नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत भाजपला फटका बसला. पुढल्या वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. निवडणुकीत फटका बसेल या भीतीनं तीन काळे कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला असावा, असं राऊत यांनी म्हटले. तर, देशातील विरोधी पक्षांनी आता एकजुट दाखवावी असे आवाहन देखील त्यांनी केले.

Protected Content