‘संजय राऊत हे बेताल विदूषक’ ; ‘तरुण भारत’ची जहरी टीका

sanjay raut

मुंबई (वृत्तसंस्था) ‘पुराणात विक्रम आणि वेताळाच्या अनेक कथा आपण ऐकल्या. आज महाराष्ट्र उद्धव आणि ‘बेताल’ ची कथा पाहतोय, ऐकतोय, सोसतोय. आपली कुवत काय, आपण बोलतो काय, याचे भान ठेवण्याची अपेक्षा महाराष्ट्राने कधीही ज्यांच्याकडून केली नाही, तशी ती आजही करण्याची गरज नाही. पण, राज्यातील दोन तृतियांश शेतकरी नैसर्गिक आपत्तीने पीडित असताना आणि त्याचं दु:ख, वेदना अहंकाराच्या गर्तेत अडकत असताना महाराष्ट्रही तितकाच हवालदिल होतोय. यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीही माफ करणार नाही’, अशी जहरी टीका ‘तरुण भारत’च्या अग्रलेखातून शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर करण्यात आली आहे.

 

राज्यात शिवसेना-भाजपमधला सत्ता स्थापनेचा तिढा आता विकोपाला गेला आहे. शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘सामना’तून भाजपवर टीकास्त्र सुरू ठेवले असताना आता ‘तरुण भारत’ या दैनिकातून संजय राऊत यांच्यावर जहरी टीका करण्यात आली आहे. तरुण भारतच्या अग्रलेखात संजय राऊत यांना ‘बेताल’ आणि ‘विदूषक’ संबोधण्यात आले आहे. त्यामुळे सेना-भाजपमधला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ‘उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांशी असलेले घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक असताना हा ‘बेताल’ शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांसाठी वेदनादायी आहे’, असा खरमरीत टोला संजय राऊत यांना लगावण्यात आला आहे.

Protected Content