‘सामूहिक वनसंपत्ती व्यवस्थापन’ पदविका अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना संधी

Mumbai University

जळगाव, प्रतिनिधी । आपल्याला खरोखरच मनापासून निसर्ग संवर्धन व संरक्षण करायचे असेल तर आपल्याला जल, जंगल, जमीन, पर्यावरण व पर्यायाने गावाचा विकास ह्या विषयी जाणून घ्यायची असते. मलावन हक्क कायदा, पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) अधिनियम, जैवविविधता अधिनियम व इतर संबधित कायद्यांविषयी जाणून घ्यायचे असल्यास व रोजगाराची संधी उपलब्ध करवून घ्यावयाची असल्यास मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त सामूहिक वनसंपत्ती पदविका अभ्यासक्रमात प्रवेश घेवून या संधीचा फायदा घ्यावा.

सामूहिक वनसंपत्ती व्यवस्थापन पदविका संपादन करून बाहेर पडलेल्या तरुणांनी गावातील नैसर्गिक संसाधनाच्या प्रभावी व्यवस्थापनाने आपल्या गावाच्या शाश्वत विकासात मोलाचा वाटा द्यावा हे ह्या पदविकेचे मूळ उद्दिष्ट आहे. विद्यार्थी जल, जंगल, जमीन, जैवविविधता, शेती, पर्यावरण ह्या विषयांचा यथोचित अभ्यास करून तसेच आपल्या अंगभूत गुणांचा व पारंपारिक ज्ञानाचा वापर गावातच आपली आजीविका स्थिर करून आपल्या गावाच्या सुयोग्य विकासासाठी करावा अशी ह्या पदविका अभ्यासक्रमाची भूमिका आहे.

वनहक्कांसोबतच ओघाने येणारी वन संवर्धन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी प्रशिक्षण व क्षमता निर्मितीची गरज लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने सामूहिक वनसंपत्ती व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम नावाने एक पदविका अभ्यासक्रम सुरु केला आहे. जानेवारी २०२० ते एप्रिल २०२० ह्या काळात हा एकूण ६६ दिवसांचा पदविका अभ्यासक्रम नंदुरबार येथे होणार आहे. हा पदविका अभ्यासक्रम नगर, नाशिक, पालघर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार ह्या 6 जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील तरुणांसाठी असून किमान 7 वी पास असलेले विद्यार्थी ह्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा देऊ शकतील.

प्रशिक्षणासाठी विद्यार्थी निवड प्रवेश परिक्षेद्वारे होईल. लेखी परीक्षेच्या 100 गुणांव्यतिरिक्त ग्रामसभेचे शिफारस पत्र असल्यास पाच अतिरिक्त गुण, परिसरात नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन विषयात कार्यरत स्वयंसेवी संस्थेची शिफारस असल्यास पाच अतिरिक्त गुण सामुदायिक वनाधिकार प्राप्त किंवा दावा केलेल्या गावांमधील उमेदवारास दोन गुण, महिला उमेदवारास दोन अतिरिक्त गुण, PVTG उमेदवारास दोनअतिरिक्त गुणांचा समावेश असेल. प्रशिक्षणाचा कालावधी: एकूण 66 दिवस (चार टप्प्यात निवासी प्रशिक्षण) प्रवेश परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता-किमान 7 वी पास, वयोमर्यादा- या पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय जानेवारी 2020 रोजी किमान 20 वर्षे पूर्ण व 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रवेश परीक्षेची तारीख – 3 जानेवारी, 2020, प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी. परीक्षा देण्यास ईछुक उमेदवारांनी श्री. संदिप चव्हाण 7744900091 ह्या क्रमांकावर संपर्क करून दिनांक 1 जानेवारी, 2020 पर्यंत नोंदणी करावी.

प्रवेश परिक्षा अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि पालघर येथील केंद्रावर घेण्यात येणार असून अहमनगर येथे मयुब्री आश्रम शाळा, नाशिक येथे एकलव्य रेसिडन्सल स्कूल आणि शासकीय शाळा, मोहदंळी, ता. कळवण, जि. नाशिक, जळगाव येथे डोंगर कठोरा आश्रम शाळा, ता. यावल, धुळे येथील कुसुंबा आश्रम शाळा, नंदुरबार येथील वाघाळे आश्रम शाळा, नंदुरबार तर पालघर येथे न्याहाळा आश्रमशाळा, जव्हार व तवा आश्रमशाळा, डहाणु येथे घेण्यात येणार आहेत.

अतिरिक्त गुणांसाठी परीक्षास्थळी आणावयाची कागदपत्रे- ग्रामसभेचे शिफारस पत्र, सेवाभावी संस्थचे शिफारस पत्र, CFRMC चे शिफारस पत्र. प्रत्येक उमेदवाराने किमान एक ओळखपत्र (पॅनकार्ड, आधार कार्ड), शैक्षणिक पात्रतेचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला, ईयत्ता 7 वी किंवा त्यापुढील परीक्षेचे गुणपत्रक) आणि जातीचे प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावर सोबत आणावे. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार येथील तसेच पालघर येथील विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा.असे आवाहन हंसराज सोनवणे, उपसंचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content