जळगावात गवळी समाजातर्फे सगर उत्सव साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  संगणक आणि इंटरनेटच्या युगातही वीरशैव लिंगायत गवळी समाजात दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदेला  रेडा, म्हैस पूजन करून  ‘सगर’ पूजनाची परंपरा कायम ठेवली आहे.  यावर्षी बुधवार दि. २६ ऑक्टोंबर रोजी “सगर” उत्सव साजरा करण्यात आला.

 

गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात विविध प्रतिबंधांमुळे सगर उत्सव साध्या पद्धतीने झाला होता. गवळी समाज पंच मंडळातर्फे  यंदा  मोठ्या जल्लोषात सगर उत्सव साजरा करण्यात आला. महाभारत काळात भगवान श्री कृष्णानी गोवर्धन पर्वत उचलून गवळी समाजाच्या पशुधनाचे संरक्षण केले होते. तेव्हापासुन सगर पूजनाची (रेडा, म्हशी पूजन) सुरवात झाली आहे असे जुने जाणकार सांगतात. पारंपरिक दुग्ध व्यवसायानिमित्त गवळी समाज बांधव दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदानिमित्त सगर उत्सव साजरा करतात.

आगामी काळात व येणाऱ्या नववर्षात राज्यासह देशात व समाजात अघटित संकट येऊ नये म्हणून गाई-म्हशी लक्ष्मीचे स्वरूप आणि  यम राजाचे वाहन रेडायांचे दिवाळी पाडव्यानिमित्त सगर पूजन केले जाते. वीरशैव लिंगायत गवळी समाज म्हैस व रेड्याच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठीही परंपरा आजही जोपासत आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गवळी समाज बांधव एकत्र जमतात. या उत्सवाचे महत्त्व म्हणजे सगर अर्थात रेड्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. गवळी समाज बांधव आपापल्या म्हशी आणि रेड्यांच्या शेंगांना मोरपिसे व झेंडूच्या माळा लावून त्यांच्या अंगावर रंगबेरंगी झुली कोरून सजवण्यात आले होते.  जळगाव शहरात मोहाडी रोड परिसर तसेच शिरसोली गवळी वाडा परिसरात वीरशैव लिंगायत गवळी समाज दैव पंच मंडळ व समाज बांधवांकडून हा सण साजरा करण्यात आला.

यावेळी वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुद्देशीय संस्थेचे जळगांव जिल्हा अध्यक्ष दिपक जोमीवाळे, युवा प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा गठरी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश लंगोटे, सचिव नारायणराव बारसे, सह सचिव अशोक जोमीवाळे, शंकर काटकर, विशाल बारसे, जेष्ठ पंच भागवतआप्पा बारसे, साहेबराव बारसे आदी समाज बांधव उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य वीरशैव  लिंगायत गवळी समाज  बहुउद्देशीय संस्थेचे प्रदेशाध्यक्ष भिमराज सत्तूआप्पा घुगरे यांनी सगर उत्सवाबाबत माहिती देतांना सांगितले की, गवळी समाजाचे  प्रमुख मानकरी आणि पंच मंडळ उपस्थित राहून आलेल्या गाई – म्हशी मालकांना  “शिवशरणार्थ” संबोधुन स्वागत करतात. महाराष्ट्रभर गवळी समाज बांधव वास्तव्यास असल्याने दरवर्षी दीपावलीनिमित्त “सगर”  ऊत्सवाची परंपरा  कायम ठेवली आहे.

प्रदेश युवा कार्याध्यक्ष कृष्णा खंडूआप्पा गठरी यांनी सागर उत्सव साजरा करतांना येणाऱ्या अडचणीबबत सांगितले की,    आजच्या स्थितीत  बोटावर मोजणे इतक्या गवळी समाज बांधवांकडे पाळीव प्राणी आहेत. वाढत्या महागाईमुळे त्यांचे पालन पोषण करणे अवघड झाले आहे. “सगर”  उत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी रेड्यांच्या मिरवणूक प्रमुख आकर्षण ठरते.

,

 

Protected Content