आदिवासी बांधवांचा प्रलंबित मागण्यांसाठी आरपीआयचा तहसीलवर मोर्चा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या न्याय हक्क व इतर प्रलंबित मागण्यांसाठी रिपाइंच्या वतीने यावल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

हा मोर्चा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. आंदोलकांनी सुमारे ४ तास तहसील कार्यालयात ठिय्या दिला होता. संबधीत अधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा पवित्रा आंदोलंकर्त्यांनी घेतली होती. या प्रसंगी विविध घोषणांनी परीसर दणाणला होता. या मार्चात शेकडो आदिवासी बांधव सहभागी होते. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर तसेच गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, वन विभाग अधिकारी विक्रम पदमोर, व आदिवासी प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे, उपस्थित नसल्यामुळे व अधिकाऱ्यांशिवाय निवेदन देणार नसल्याचे घोषित केल्याने आदिवासी बांधवांनी सुमारे चार तास तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन दिले होते.

कृषी कायदा लागू करण्यात यावा, बियाणे मोफत देण्यात यावे, शेतकऱ्यांना सर्व सुविधा लागू कराव्या, वनदावे तात्काळ मंजूर करून नावावर करून द्यावे, घरकुल योजनेतून घर उपलब्ध करून देणे, आदीवासी योजनेचा लाभ मिळवून द्यावा, वस्तीत पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, रेशनकार्ड, रेशन धान्य, रस्ता काँक्रीटीकरण, गटारींसह इतर मुलभूत सुविधांची पुर्तता करण्यात यावी अश्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. १५ दिवसांच्या आत मागण्या पुर्ण न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजु सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष विष्णू पारधे, पप्पु भालेराव, विक्रम प्रधान, सुर्यभान इंगळे, मिलींद सोनवणे, रजीया खाटीक, सलीमा पिंजारी, मंगलाबाई सावळे, छाया मेढे चैताली वानखेडे,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इश्वर इंगळे, सुनिल तायडे, श्रीकांत वानखेडे, सुदाम सोनवणे, बाळु सोनवणे, शरद सोनवणे, विक्की तायडे, संजय तायडे, विलास भास्कर सह मोठया संख्येत रिपाईचे पदाधिकारी,कार्यकर्ते व आदिवासी समाज बांधव मोर्चात सहभागी होते.

Protected Content