यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील आडगाव येथे जुन्या वादातुन दोन गटात वाद झाल्याने दंगलीची घटना घडली असुन, गावात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले आणि अप्पर पोलीस अधिक्षक रोहीत मतानी यांनी आज (दि.१३) घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, आडगावातील मुख्य चौकात काल रात्रीच्या पूर्ववैमनस्यातून दोन गटात वाद होवुन चौकातील काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली.रात्री झालेल्या या दंगलीचे निमित्त साधून काही विघ्नसंतोषी लोकांनी काही शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे नुकसान केल्याचे कळले आहे. दंगलीत झालेल्या दगडफेकीत नऊ जण जखमी झाल्याचे वृत आहे. त्यामध्ये दीपक सुनील पाटील, सोनू भगवान पाटील, गिरीश राजेंद्र पाटील, महेश रघुनाथ पाटील, महेश प्रकाश कोळी, अमिना रमजान तडवी, सुभान गंभीर तडवी, अकिल सुभान तडवी व अरमान तडवी यांचा समावेश आहे. दोन्ही गटांनी याबाबत एकमेकांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार सुमारे ८९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फैजपुर उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे हे आज सकाळीच घटनास्थळी दाखल झाले आहेत. गावात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असुन, परिस्थिती सध्या नियंत्रणाखाली असली तरी गावात तणावपूर्ण शांतता आहे. या दंगलीतील दोषी व्यक्तींना कायद्याने शिक्षा केली जाईल, कुणालाही माफ केले जाणार नाही, असे आश्वासन पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी भेटीप्रसंगी पत्रकारांशी बोलताना दिले.