भुसावळ (प्रतिनिधी) दुष्काळाची तीव्रता जाणून संस्कृती फाउंडेशनद्वारे राबविण्यात येणाऱ्या ‘नदी पुनर्जीवन’ प्रकल्पाला व्यापक स्वरूप लाभले आहे. यंदाचे पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन तसेच दुष्कावर मात करून पाणीटंचाईचे संकट निवारण्यासाठी व पावसाचे पाणी जमीनीत जिरविण्यासाठी संस्कृती फाउंडेशनतर्फे शहराच्या जवळपास असलेल्या नद्यांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ह्या उपक्रमाला गेल्या आठवड्यात सुरवात झाली असून आता ह्या उपक्रमाला शहरातील सुजाण नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ह्या उपक्रमाअंतर्गत चोरवड नदीला श्रमदानातून पुनरुज्जीवन मिळाले आहे. ह्या उपक्रमाला गेल्या रविवारी सुरवात झाली असून चोरवड जवळील नदीचे कार्य हे पूर्ण झाले आहे. ह्यामध्ये डॉ. संजय नेहते व मनोज तडवी ह्यांचाकडून जेसिबी मशीन यंत्रणा देण्यात आली आहे. तसेच श्रमदानातून सुमारे दोन दगड मातीचे बंधारे ह्या नदीवर बांधण्यात आले आहेत. शहराच्या अवती-भोवती असलेल्या नदी नाल्यांमध्ये नैसर्गिकरित्या जलसंधारण होऊ शकते, त्यामुळेच उन्हाळ्यात सुट्टीचा दिवस सत्कारणी लावण्यासाठी संस्कृती फाउंडेशनचे अध्यक्ष रणजितसिंग राजपूत ह्यांचा नेतृत्वाखाली या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. ह्या संपूर्ण कार्याचे नियोजन व पूर्वतयारी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख अश्फाक तडवी व तुषार गोसावी ह्यांनी केले आहे. जलसंवर्धन ही काळाची गरज असून ही गरज ओळखून संस्थेने हा उपक्रम सुरू केला ह्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ह्या उपक्रमात शहरातील डॉक्टर, शिक्षक, जेष्ठ नागरिक हे मोठ्या संख्येने सहभागी होऊन दुष्काळाशी कृतीतून मात करीत आहेत. ‘संस्कृती’च्या ह्या कार्यात श्रमदानासाठी आमदार संजय सावकारेसुद्धा सहभागी होऊन श्रमदान करीत आहेत.
ह्या श्रमदानासाठी अजित गायकवाड, पराग चौधरी, मंगेश भावे,डॉ. नीलिमा नेहते, हर्षल येवले, प्रियंका पाराशर, सोहिल कच्छि, पवन कोळी, कोमल बोरणारे, माधुरी विसपुते, हर्षवर्धन बाविस्कर, इकबाल तडवी, मधुर भिंगारदिवे, सीमा आढळकर, पौर्णिमा तायडे, सतीश कांबळे, अशोक चौधरी, अनिल जोशी, जितेश टाक, प्रवीण पाटील, सलमान तडवी, विक्रांत बांगर, इकबाल तडवी, सचिन गोसावी आदींनी सक्रीय सहभाग घेतला होता. तसेच श्रमदानासाठी लागणारी कुदळ, फावडे, टोपली इत्यादी साधनसामग्री शहरातील व्यावसायिक सुहास कोळी ह्यांनी उपलब्ध करून दिली आहे.