मुंबई (वृत्तसंस्था) उतू नका मातू नका नाहीतर माती होईल. सत्तेचा माज दाखवाल तर याद राखा, असा जनादेश देणारा निकाल ‘ईव्हीएम मधून बाहेर आला असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून विश्लेषण करत भाजपवर टिकेचे बाण सोडले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपने ‘अब की बार, २२० पार’ अशी घोषणा दिली होती. आमच्या समोर कुस्तीसाठी पैलवानचं नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक सभांतून सांगत होते. मात्र, वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे निकालातून समोर आले. पवारांच्या झंझावातामुळे महायुतीचा वारू जेमतेम १८० पर्यंतच रोखला गेला. राष्ट्रवादी व काँग्रेसने दमदार पुनरागमन केले. उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून निकालाचे विश्लेषण करताना निकालाकडे लक्ष वेधत भाजपला टोले हाणले आहेत. ‘महाराष्ट्राच्या भावना दडपून कुणाला पुढे जाता येत नाही व मराठी भावनांच्या छाताडावर पाय ठेवून कुणाला राज्य करता येत नाही. सत्तेचा माज दाखवाल तर याद राखा, असा स्पष्ट कौल जनतेने दिल्याचे उद्धव यांनी म्हटले आहे.