कासोदा (प्रतिनिधी) चातकासारखी ज्याची शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता वाट पाहत होते , त्या वरूणराजाचे आगमन अखेर जूनच्या पंधरवड्यात का होईना पण झाले. सोमवारी सकाळी पहाटे पहाटे मेघ गर्जनेसह एरंडोल तालुक्यातील जवळपास सर्वच ठिकाणी कमी जास्ती प्रमाणात पावसाने हजेरी लावली. आधीच दुष्काळाच्या झळांनी संपुर्ण तालुका होरपळाला आहे. पंधरा- वीस दिवस उशीराका होईना पण पावसाच्या सरी बरसू लागल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
अनेक दिवसापासून शेत पेरणीसाठी सज्ज ठेऊन , बी – बियाणी इतर सर्व सामुग्रीची जय्यत तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवली होती. इकडे सिंचनाची व्यवस्था असणाऱ्यांनीही शेतातील जलस्त्रोतांमधील पाण्यात कमालीची घट झाल्याने कोणत्याही बियाणे लागवडीची जोखीम घेतली नाही. आता सद्य स्थितीत तरी पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्ग आनंदी तर आहेच त्यासोबतच कपाशी लागवडीला धावपळ सुरू झाली आहे. दुसरीकडे तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांनाही वरूणराजाच्या आगमनाने चिंता दूर होण्यास मदतच होणार असल्याचे सर्वच ठिकाणचे चित्र आहे.