अमित शहा बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांना जामीन

rahul gandhi

अहमदाबाद, वृत्तसंस्था | काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना आज अहमदाबाद कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना हत्येचा आरोपी म्हटले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ डिसेंबर रोजी होणार आहे.

 

‘सर्व मोदी चोर’ आहे असे म्हटल्याप्रकरणी अहमदाबादमधील अन्य एका न्यायालयात हजर झाल्यानंतर आपण याप्रकरणी निर्दोष आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. राहुल गांधी तीन प्रकरणातील खटल्यात हजर होण्यासाठी सध्या अहमदाबाद येथे आले आहे. राहुल गांधी यांनी जबलपूर मधील एका रॅलीत भाषण करताना अमित शहा यांच्यावर टीका करताना त्यांना हत्येचा आरोपी असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे नगरसेवक कृष्णवदन ब्रम्हभट्ट यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी आज करण्यात आली. न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला.

येथील न्यायदंडाधिकारी कोर्टाने राहुल यांच्या विरोधात मे महिन्यात समन्स जारी केले होते. गुजरातमध्ये गाजलेल्या सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणातून अमित शहा यांची २०१५ साली कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे. शाह हे निर्दोष असताना त्यांना हत्येचा आरोपी म्हणणे चुकीचे आणि कोर्टाचे उल्लंघन करणारे आहे, असे म्हणत भाजप कार्यकर्त्याने राहुल गांधी यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांना एका प्रकरणात आज जामीन मिळाला असला तरी त्यांना आणखी एका प्रकरणात हजर व्हायचे आहे. अहमदाबाद जिल्हा सहकारी (एडीसी) बँक यासंबंधी जोडलेला हा खटला आहे. राहुल गांधी यांनी आरोप केला होता की, नोटबंदी दरम्यान एडीसी बँकेत पाच दिवसात ७५० कोटी रुपये बदलण्यात आले आहे. अमित शहा हे या बँकेचे संचालक आहेत, त्यांच्या सांगण्यावरून या बँकेतील नोटा बदलण्यात आल्या आहेत, असा दावा गांधी यांनी केला होता. राहुल यांच्या दाव्यानंतर त्यांच्याविरोधात बँकेच्या अध्यक्षाने अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.

Protected Content