यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | काश्मीरमधील पहेलगाम भागात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले असून या भीषण घटनेचा निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने यावल तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे हे निवेदन सादर करण्यात आले.
२१ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात भारतीय तसेच परदेशी पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत असून यावलमधूनही तीव्र प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने यामध्ये अपयश पत्करले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
निवेदनात अतिरेक्यांचा तात्काळ खात्मा करावा, काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित करावी, सुरक्षा यंत्रणा मजबूत करावी तसेच पाकिस्तानला याचे प्रत्युत्तर द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. शहीद पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या.
या वेळी शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, शरद कोळी, संतोष धोबी, पप्पू जोशी, सुनील बारी, योगेश चौधरी, विनोद कोळी, सारंग बेहेडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.