पुनर्वसन करतांना शेतकरी व ग्रामस्थांचे हित जोपासा – डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलढाणा प्रतिनिधी । पेनटाकळी प्रकल्पाच्या पश्चजलामुळे बाधित होणाऱ्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसन करतांना ग्रामस्थांचे तसेच अरकजेरी प्रकल्पात बाधित शेतजमिनीचे भूसंपादन करतांना तेथील शेतकऱ्यांचे हित जोपासत त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची संबधित यंत्रणेने काळजी घ्यावी, अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या पश्चजलामुळे  बाधित झालेल्या पांढरदेव, घानमोड, मानमोड गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. विशेष म्हणजे पांढरदेव येथील घरांचे पुनर्वसन तातडीने होणे गरजेचे आहे. यासाठी  जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित केली होती. 

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की  पुनर्वसन करतांना एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून या गावाचे पुनर्वसन करावे. 15 दिवसात गावकऱ्यांना प्लॉट वाटप करून त्यांना लवकरात लवकर मोबदला कसा देता येईल यासाठी प्रयत्न करावे. या गावाच्या पुनर्वसनाकरिता लागणार निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी आपण स्वतः उपमुख्यमंत्री मा ना अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री मा ना जयंत पाटील यांना भेटून त्यांच्याकडे मागणी करणार असल्याच ते म्हणाले.

संग्रामपूर तालुक्यातील अरकजेरी प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शेत जमिनीचा सर्व्हे करून सयूंक्त मोजणी करण्यात यावी. हे काम करत असतांना कुठल्याही शेतकऱ्यांवर व ग्रामस्थांवर अन्याय होणार नाही याची काळजी संबधित यंत्रणेने घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Protected Content