जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्र विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत असताना, या प्रगतीचा वारसा थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जळगावमध्ये “प्रगतीशील महाराष्ट्र २०२५” या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सोमवार, ३ नोव्हेंबरपासून ते बुधवार, ५ नोव्हेंबरपर्यंत शिवतीर्थ-जीएस ग्राऊंड येथे रंगणार आहे. या विशेष उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे आणि दिल्लीतील फ्रेंड्ज एक्झिबिशनच्या संचालिका अखिला श्रीनिवासन यांनी पत्रकार परिषदेत केले.

दिल्लीस्थित फ्रेंड्ज एक्झिबिशन अँड प्रमोशन या संस्थेमार्फत केंद्र सरकारच्या जनजागरण मोहिमेचा भाग म्हणून या प्रदर्शनाला मूर्त रूप देण्यात आले आहे. “एक उन्नत राष्ट्र की और…” या घोषवाक्याखाली भरविण्यात येणारे हे प्रदर्शन दररोज सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत नागरिकांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, अनिल पाटील, किशोर पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत सोनवणे, चंद्रकांत पाटील आणि अमोल जावळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, या प्रदर्शनात केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांकडून चालवल्या जाणाऱ्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्टॉल्स असतील. यात कृषी आणि ग्रामीण विकास, भूवैज्ञानिक सर्वेक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण, आयुष, मत्स्यपालन, महाऊर्जा, भारतीय मानक ब्युरो, आयसीएमआर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड, भारतीय लघुउद्योग विकास बँक, इंडियन फॉर्मस फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह, गुजरात इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, न्यू इंडिया इन्शुरन्स, भारतीय समुद्री विद्यापीठ, भारतीय विमान प्राधिकरण, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त मंडळ, कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड, महाराष्ट्र बांबू, ओडिशा बांबू, आधार प्रकल्प, जळगाव महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन तसेच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे इनक्युबेशन सेंटर यांचा सहभाग असेल.
जळगावमध्ये अशा प्रकारचे सर्वसमावेशक आणि ज्ञानाधारित प्रदर्शन पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असून, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक विकास यांचा संगम असलेली ही संधी जळगावकरांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मतही स्मिताताईंनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. राधेश्याम चौधरी, फ्रेंड्ज एक्झिबिशनच्या संचालिका अखिला श्रीनिवासन, संचालक आनंद पाल, दीपकसिंग मेहता आणि साक्षी सैनी आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी *शोध प्रकल्प स्पर्धा* आयोजित करण्यात आली आहे. जळगावमधील आठ शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित प्रकल्प या प्रदर्शनात सादर केले जाणार आहेत. नव्या पिढीतील नाविन्यपूर्ण प्रयोगकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जाईल.
या प्रदर्शनामुळे जळगावकरांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांबद्दल थेट आणि सखोल माहिती मिळणार असून, नव्या भारताच्या प्रगतीकडे वाटचाल करणारा महाराष्ट्र अधिक सक्षम आणि प्रबुद्ध होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.



