शरद पवारांना सत्तेत मोठा वाटा अन राष्ट्रपती पदाची ऑफर ?

sharad pawar

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रस्तावित महाशिवआघाडी सरकारची संथपणे शिजत असलेली खिचडी आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ता चर्चेबाबत गुगली टाकून निर्माण केलेल्या संभ्रमामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच, मोदी सरकार शरद पवार यांना सन २०२२ मध्ये राष्ट्रपतिपदी नियुक्त करणार असल्याच्या आवईची भर पडली असून, महाराष्ट्रात राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी भाजपसोबत हातमिळवणी करावी म्हणून शरद पवार यांच्यावर पक्षाचे दोन खासदार दबाव आणत असल्याचीही चर्चा आहे.

 

सोमवारी सायंकाळी सोनिया गांधी यांच्याशी प्रस्तावित महाशिवआघाडी सरकारच्या स्थापनेविषयी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेला सामोरे गेलेले शरद पवार यांच्या विधानांमुळे काँग्रेस व शिवसेनेचे नेते आणि माध्यमेही वैतागली. अशा बैठकीनंतर सोनिया गांधी कुठलेही वक्तव्य करत नाहीत. त्यामुळे दुसरी बाजू समोर येत नाही. पण, ‘आपली सरकार स्थापनेवरून सोनिया गांधींशी चर्चा झालीच नाही’, असे अविश्वसनीय वाटणारे विधान करण्याची शरद पवार यांना आवश्यकता नव्हती. महाराष्ट्राच्या राजकारणातील ते मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी माध्यमांसह कुणालाही न पटणारी विधाने करून संभ्रम निर्माण करायला नको होता, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात उमटली. शिवसेनेचा किल्ला लढवणारे संजय राऊत यांनाही, ‘पवार यांना समजण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील’, अशी टिप्पणी करावी लागली.

महाराष्ट्रात सरकार स्थापण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत हातमिळवणी करावी म्हणून पवार यांच्यावर पक्षाचे दिल्लीतील दोन खासदार दबाव आणत असून ते अजित पवार यांचेही मन वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा मंगळवारी होती. ‘भाजपसोबत केंद्रात तीन मंत्रिपदे आणि राज्यात सत्तेत मोठा वाटा’, अशा फॉर्म्युल्यासह शरद पवार यांना जुलै २०२२मध्ये राष्ट्रपतिपद देण्याची ऑफर असल्याची चर्चा सुरू होती. आपला जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी राष्ट्रवादी संभ्रम निर्माण करीत असल्याची टीका राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. राज्यात महाशिवआघाडीच्या सरकार स्थापनेविषयी काँग्रेस आणि शिवसेनेला कोणतीही अडचण नसून, शरद पवार यांनी आपली राजकीय विश्वासार्हता राखण्यासाठी सरकार स्थापनेची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास हातभार लावला पाहिजे, असे मत या पक्षांचे नेते व्यक्त करीत होते.

Protected Content