दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० मतदारसंघात मतदान

 

evm

मुंबई (वृत्तसंस्था) देशासह राज्यात १० मतदारसंघात उद्या (दि.१८ एप्रिल) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी आज रवाना झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या टप्प्यात एकूण १७९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून २० हजार ७१६ मतदान केंद्रे सज्ज आहेत. त्यापैकी सुमारे २१०० मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्टही होणार आहे.

 

या टप्प्यातील सर्वाधिक ३६ उमेदवार बीड मतदारसंघात असून सर्वात कमी १० उमेदवार लातूर मतदार संघात आहेत. याव्यतिरिक्त बुलढाणा मतदारसंघात १२ उमेदवार, अकोला ११, अमरावती २४, हिंगोली २८, नांदेड १४, परभणी १७, उस्मानाबाद १४ आणि सोलापूर मतदारसंघात १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे.

Add Comment

Protected Content