अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील 14 शेतकऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांनी खाक्या दाखवताच गाड्यांपाठोपाठ आरोपी ठेकेदाराने बैलांच्या मोबदल्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर 40 हजार रुपये जमा केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ऊस तोडीसाठी नगर जिल्हयातील भेंडा साखर कारखान्यावरील ठेकेदार बाळासाहेब ताके याने अमळनेर तालुक्यातील 14 शेतकऱ्यांचे बैलजोड्या व गाडया भाड्याने नेऊन बैलजोड्या परस्पर विकून गाड्या देखील परत केल्या नव्हत्या आणि उलट पक्षी शेतकऱ्यांना 12 लाख 93 हजार रुपये घेणे असल्याच्या नोटीसा दिल्या होत्या. ऐन दुष्काळात शेतकऱ्यांवर संकट कोसळले होते आगामी वर्षाची मशागत कशी करावी, याची चिंता पडली होती. शेतकऱ्यांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्फत पाठपुरावा करून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर ताके याला अटक करून 14 गाड्या जप्त केल्या होत्या. मात्र 14 बैल जोड्या त्याने विकून टाकल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. अखेर पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी हिसका दाखवताच ठेकेदार ताके याने आपल्या भावामार्फत प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर 40 हजार रुपये जमा केल्याने अंशतः बैलांच्या ऐवजी काही रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी माजी आमदार साहेबराव पाटील व पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांचे आभार मानले आहे.