अमळनेर ते खवशी बस फेरी वाढवण्याची प्रवाशांची मागणी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |अमळनेर बस स्थानकावरून मागील काळात रोज संध्याकाळी अमळनेर ते खवशी बस फेरी सुरू होती. मात्र अमळनेर बस आगाराने सदर बस बंद केल्याने प्रवाशांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी अमळनेर हुन पुन्हा खवशी जाण्यासाठी संध्याकाळची बस सुरू करण्याची मागणी खवशीसह खेडी, गांधली, अमळगाव, नांन्द्री, पातोंडा परिसरातील प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.

पूर्वी सुरू असलेली खवशी मार्गे अमळनेर चोपडा बसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद होता.त्यामुळे नोकरी,शिक्षण व व्यवसाय  निमित्ताने अमळनेर व चोपडा जाणाऱ्या ह्या गाडीचा लाभ होता.पण सदर बसफेरी काही वर्षांपासून बंद केल्याने प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. सद्यस्थितीत खवशी येथील अनेक महिला, पुरुष प्रवासी नोकरी निमित्ताने व व्यवसायानिमित्ताने अमळनेर रोजनिशी ये-जा करीत असतात. कामावरून सुटण्याची वेळ संध्याकाळची असल्याने प्रवाशांना खवशी येथे जाण्यासाठी थेट बस सुविधा नाही.

त्यांना नाईलाजाने पातोंडा येथे जावे लागते. आणि तेथून खवशी जाण्यासाठी त्यांना वाहनांची सुविधा नसल्याने अंधाराच्या काळोखात पायपीट करून घर गाठावे लागत आहे.तसेच चोपडा हुन खवशी जाण्यासाठी प्रवाशांची संध्याकाळची तीच परिस्थिती आहे.यासाठी प्रवाशांचा जास्तीचा वेळ जात असून शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे अमळनेर बस आगार व्यवस्थापकाने रोज संध्याकाळी अमळनेर बस स्थानकावरून खवशी मार्गे अमळनेर चोपडा बस सुरू करावी. जेणेकरून गांधली,पिळोदा,अमळगाव, खेडी, खवशी, नांन्द्री,पातोंडा, सावखेडा, निमगव्हाण परिसरातील प्रवाशांना ह्या बसचा फायदा होईल.तरी प्रवासी वर्गामधून सदर बसफेरी सुरू करण्याची मागणी जोर करत आहे.

Protected Content