पाकिस्तानकडून भारतीय शेतकऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न

l 233458 124918 updates

पठाणकोट (वृत्तसंस्था) भारताच्या सीमारेषेवर केवळ दहशतवादीच घुसखोरी करत नाहीत तर पाकिस्तानी नागरिकही घुसखोरी करून शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मारहाण करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे या शेतकऱ्याला पाकिस्तानच्या हद्दीत ओढत नेण्याचाही प्रयत्न झाला आहे.

 

पठाणकोटमधील बमियाल भागातील खुदाईपुर या गावात हा प्रकार घडला आहे. शेतकरी सुखबीर सिंह लक्खा त्याच्या सीमेलगतच्या शेतात काम करत होता. यावेळी अचानक एकपाकिस्तानी नागरिक तेथे आला. त्याने सुखबीरला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याला ओढत पाकिस्तानच्या हद्दीत नेण्याचा प्रयत्न झाला. यावेळी सुखबीरने आरडाओरडा केल्याने आजुबाजुच्या शेतात काम करणारे शेतकरी वाचवण्यासाठी धावले. लोक आलेले पाहून पाकिस्तानी नागरिक पळून गेला. त्याच्यासोबत अन्य तीन जण शस्त्रांसह होते, असे सांगितले जात आहे. हे सर्वजण पाकिस्तानी रेंजर पोस्टच्या दिशेने गेले. हा धक्कादायक प्रकार पाकिस्तानी रेंजरकडूनच केला गेल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

सुखबीर यांनी सांगितले की, अशाप्रकारची ही या भागातली पहिलीच घटना आहे. यानंतर गावकऱ्यांनी पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या. सरपंच रणजीत सिंग यांनी सांगितले की, सीमेला लागून असलेल्या शेतात गावकरी काम करतात. यावेळी जवान त्यांच्यासोबत नसतात. यामुळे ही घटना घडली आहे. यावर एएसआई तरसेम लाल यांनी सांगितले की, शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार चौकशी सुरु आहे. यानंतर हे प्रकरण बीएसएफकडे देण्यात येईल.

Add Comment

Protected Content