विवाहितेचा संशयास्पद मृत्यू : पतीने गळा आवळल्याचा आरोप

पाचोरा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गाळण येथील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिच्या पतीनेच गळा आवळून खून केल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, धुळे तालुक्यातील मुंडाणे तांडा येथील मनीषाचा विवाह विष्णूनगर येथील चेतन दलेरसिंग राठोड याच्याशी दोन वर्षांपूर्वी झाला होता. विवाह झाल्यावर दोन महिन्यांनंतर पती, सासू, सासरे, ननंद, जेठ व जेठानी हे मनिषाला हुंडा व संसारोपयोगी वस्तू न दिल्याने छख करत होते. यातच तिच्या पतीने अनैतिक संबंध देखील होते.

दरम्यान, मनीषा माहेरी गेल्यानंतर तिने भाऊ ज्ञानेश्वर जगन्नाथ राठोड याला पतीच्या अनैतिक संबंधांची माहिती सांगितली होती. भावाने समजूत काढून तिला नांदायला पाठवले होते. यानंतर काल सकाळी सहा वाजता विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर याला विवाहितेचा जेठ जयसिंग राठोड याने फोन केला. तुझ्या बहिणीला झोपेतच हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याने नातेवाईकांसह गाळण गाठले.

संबंधीत विवाहितेचा पती चेतन राठोड यानेच तिचा गळा आवळून खून केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. याबाबत पोलिस पाटील विनोद राठोड यांनी घटनेची माहिती नगरदेवळा दुरक्षेत्राचे हवालदार विनोद पाटील यांना दिली. मृत विवाहितेला ९ महिन्यांचा यश नावाचा मुलगा आहे. पोलिसांनी पती चेतन राठोड याला ताब्यात घेतले आहे. पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, उपनिरीक्षक गणेश चौबे हे पुढील तपास करत आहेत.

Protected Content