विद्यापीठात अनुसूचित जमातीच्या समुदायासाठी चार दिवसीय कार्यशाळाचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व भारत सरकार द्वारा प्रायोजित राष्ट्रीय विज्ञान अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या समुदायासाठी जैवमात्रा परावर्तन, शाश्वत शेती, हरित ऊर्जा आणि जैवतंत्राधारित अर्थव्यवस्था या विषयांवर चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.९ ते १२ मार्च दरम्यान हरणखुरी व दि.२३ ते २६ मार्च दरम्यान राणिपूर जि.नंदूरबार येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या लाईफ सायन्सेस प्रशाळेचे प्रा.डॉ.नवीन दंदी, प्रा.डॉ.ए.बी.चौधरी, प्रा.डॉ. भूषण चौधरी व प्रशाळेचे संचालक प्रा. अरूण इंगळे हे गेल्या दोन वर्षांपासून नंदूरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या युवक आणि शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती, सेंद्रिय खते, जैवमात्रा परावर्तन, शाश्वत शेती, जैवतंत्राधारित शेती आणि त्यामागील अर्थव्यवस्था या विषयांवर मार्गदर्शन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.

मार्च महिन्यात होणाऱ्या या कार्यशाळेत शेतीत सुक्ष्मजीवाणूचे फायदे, शेतीत त्यांचा वापर, सुक्ष्मजीवाणूपासून खत निर्मिती कशी करावी, रासायनिक खतांमुळे जमिनीवर होणारे दुष्परिणाम, शेती आणि शेतीशी निगडित जोडधंदे, कमी क्षेत्रात जास्तीत जास्त कसदार उत्पादन कसे घ्यावे या विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. बायफ संस्थेचे लीलेश चव्हाण यांचे सहकार्याने कार्यशाळेच्या ठिकाणाच्या परिसरातील ६० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

Protected Content