जळगाव, प्रतीनिधी | अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन, जळगाव शाखेतर्फे युवाशक्ती फौंडेशनच्या सहकार्याने शहरात अवयवदानाचे महत्व सांगणारी जनजागृती रॅली शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे.
संस्थेतर्फे देशभर अनेक शहरांमध्ये ३१ रोजी रॅली निघणार असून त्याचाच भाग म्हणून जळगावातही रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. देशातील सर्व रॅलीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये केली जाणार आहे. रॅलीची सुरुवात भाऊंचे उद्यानपासून प्रमुख पाहुणे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून होईल. त्यानंतर रॅली सागर पार्क मार्गे ओंकारेश्वर मंदिर येथे समाप्त होईल. रॅलीत अवयवदानाचे महत्व सांगणारे फलक असून घोषणा दिल्या जाणार आहेत. उत्कृष्ट स्लोगन असणा-यांना पारितोषिक दिले जाणार आहेत. रॅलीत विद्यार्थी, नागरिकांनी, महिला संघटनानी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्षा अंशू अग्रवाल, सचिव पूजा अग्रवाल, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक विराज कावडिया, सचिव अमित जगताप यांनी केले आहे.