दहा दिवसात मंदिरे उघडा अथवा आंदोलन करणार ! : अण्णा हजारे

नगर | आता कोरोना आटोक्यात येत असतांना सात्वीक गुणांचा प्रसार करणार्‍या मंदिरांना का उघडण्यात येत नाही असा प्रश्‍न करत सरकारने दहा दिवसात याबाबत निर्णय न घेतल्यास आपण आंदोलन छेडणार असल्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.

नगरच्या मंदिर बचाव कृती समितीने जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेवून राज्यातील बंद असलेली सर्व मंदिरे उघडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, असे साकडे घातले. मंदिर बचाव कृती समितीचे प्रमुख वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, श्री शिव प्रतिष्ठानचे बापू ठाणगे, बाळासाहेब खताडे, गणेश पलंगे आदी उपस्थित होते.

अण्णा हजारे पुढे म्हणाले, भरकटत चालेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. आज ८४ वय झाले आहे. मात्र माझ्यावर एवढासाही कोणताच डाग नाहीये. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीजवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालोय. संतांचे विचार देणारे मंदिरे का बंद केली. सरकारला संतांचे विचार काय समजले? त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलावे व त्वरित मंदिरे उघडावीत, असे अण्णांनी म्हटले आहे.

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले? मंदिर बचाव कृती समितीने मंदिरं उघडण्यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल. सरकारचे धोरण बरोबर नाहीये. १० दिवसात जर मंदिर उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भोरो आंदोलन करा, मी तुमच्या बरोबर राहील, असा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला.

Protected Content