पाडळसरे धरण पूर्ण करण्याची मानसिकता फक्त राष्ट्रवादीकडेच-गुलाबराव देवकर

1c837c7c ad43 491b a16e 1bc227152855

अमळनेर (प्रतिनिधी) सध्या पाडळसरे धरण तालुक्यातील सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असताना या धरणाचे काम युती शासनाच्या काळात रखडले, अपेक्षित त्या प्रमाणावर निधी न मिळाल्यामुळे धरणाचे काम पूर्ण होऊ शकत नाही ही शोकांतिका आहे. आघाडी शासनाने सगळ्यात जास्त निधी म्हणजे ४५० कोटी रुपये धरणाला दिले होते. धरण पूर्ण करण्याची मानसिकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच आहे, असे येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्क कार्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत माजी मंत्री व जळगाव लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर सांगितले.

 

जिल्ह्यात औद्योगिक वसाहत परिसराकडे आजवर दुर्लक्षित झाल्यामुळे औद्योगिक वसाहत विकसित होण्यास गेल्या १० वर्षात प्रयत्न करण्यात आले नाहीत. त्यामुळे आज अनेक तरुण बेरोजगार आहेत, या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील राहील. रखडलेल्या पाडळसरे धरणासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहील. पाडळसरे धरण पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षा केंद्र, गाव तेथे व्यायाम शाळा, प्रत्येक तालुक्यात उद्योगधंदे उभारून बेरोजगार तरुणांना हाताला काम दिले जाईल. आरोग्य शिक्षण चांगल्याप्रकारे देण्याचा प्रयत्न आमचे सरकार करेल. आता प्रचार करत असताना मतदारांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.

घरकुल प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दोष नसताना मला त्या ठिकाणी गोवण्यात आले. विरोधी पक्ष मला बदनाम करण्याचा कुटील डाव करीत आहे. भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्याने बदलाबदलीचे कुरघोडीचे राजकारण सुरू आहे, हे चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रचाराला लागलेली आहे, विजय आमचाच आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तालुक्यात प्रचार करत असताना ग्रामीण भागामध्ये सडावण, रत्नापिंप्री, अंबापिंपरी, शिरूड, बहादरपुर, शेवगे, इंधवे, जानवे रणाईचे या गावांमध्ये प्रचार करून स्थानिक कार्यकर्ते व मतदारांना भेटून गाठीभेटी घेतल्या व त्यांचे प्रश्न समजून घेतले. दुपारी अंतुली, रंजाणे, खापरखेडा, सात्री, डांगरी, मारवड, कळमसरे या गावांना भेटी देऊन कार्यकर्त्यांशी हितगुज करणार आहे.

पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते अनिल भाईदास पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील, जयवंतराव पाटील, माजी नगराध्यक्ष विनोद भैया पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, विनोद कदम, पराग पाटील
यांच्यासह राष्ट्रवादी व कॉंग्रेसचे बरेच पदाधिकारी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content