जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या आधारभूत दराने (हमीभाव) नाफेड अंतर्गत २०२४-२५ हंगामातील तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नोंदणीची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली असून, शेतकरी ३० एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करू शकणार आहेत.
जिल्ह्यातील एकूण १६ खरेदी केंद्रांवर ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या केंद्रांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२५ असून, तूर खरेदीचा कालावधी १३ फेब्रुवारी २०२५ ते १३ मे २०२५ दरम्यान असणार आहे. यावर्षी तुरीचा हमीभाव ७५५० रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आधारकार्ड, बँक पासबुक, ऑनलाइन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा आणि ८ अ ही आवश्यक कागदपत्रे घेऊन आपल्या जवळच्या खरेदी केंद्रावर त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय संचालक मंत्री संजय वामनराव सावकारे, उपाध्यक्ष रोहितदादा दिलीपराव निकम, संचालक संजय मुरलीधर पवार आणि प्रभारी जिल्हा पणन अधिकारी एस.एस. मेने यांनी केले आहे.