नांदेड-वृत्तसेवा । मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी सरकराने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्याकडे 24 डिसेंबरपर्यंत मुदत मागितली होती आणि जरांगे यांच्याकडून मुदत देण्यात देखील आली होती. तसेच, 24 डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा तिढा न सुटल्यास आपण मराठा समाज बांधवांसह मुंबईत धडकणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. त्यामुळे मुदत संपण्यासाठी आता फक्त 15 दिवसांचा कालवधी राहिला आहे. मात्र, सरकारकडून अपेक्षित हालचाली होत नसल्याने मराठ्यांनो मुंबईला जाण्यासाठी तयार रहा असे थेट आवाहनच जरांगे यांनी नांदेडच्या नायगाव येथील सभेतून केले आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, शुक्रवारी त्यांची नायगाव सभा पार पडली. विशेष म्हणजे मुंबईला जाण्यासाठी मराठा समाजाने तयार राहावे असे जरांगे पहिल्यांदाच बोलले आहे. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “आता मराठ्यांनी मुंबई येथे जाण्यासाठी तयार राहावे. माझा जीव गेला तरी चालेल. मी माझ्या आई-वडीलांना सांगितले आहे की, मी मेलो तर तीन मुलांवर समाधान मानावं. बायकोला कपाळ पुसून बस असं सांगितले आहे. माझ्या जीवाची बाजी लावणार, पण एक पाऊल सुद्धा मागे हटणार नाही, असे सांगून घराच्या बाहेर पडलो आहे. आरक्षणाशिवाय पर्याय नाही आणि ते घेतल्या शिवाय स्वस्त बसणार नाही, असे जरांगे म्हणाले.