जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “बचत गटातील प्रत्येक महिला ही आपल्या घराची अर्थमंत्री आहे. बचत गटाच्या माध्यमातून व्यवसायाला चालना द्या, पारदर्शकता ठेवा, आणि वेळेवर ऑडिट सादर करा. व्यवसायात विश्वासार्हता जपा. ‘लखपती दीदी’ होण्यासाठी फक्त कर्ज नाही, तर कल्पकता लागते,” असे मौलिक प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. म्हसावद-बोरनार जिल्हा परिषद गटातील ‘पद्मालय’ महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हजारो बचत गट महिलांच्या उपस्थितीत ते मार्गदर्शन करत होते.
बचत गट म्हणजे छोटा संसार, मोठा व्यापार
पालकमंत्री पाटील यांनी महिलांना उद्देशून म्हटले, “बचत गट म्हणजे छोटा संसार, पण त्यात लपलेला असतो मोठा व्यापार. तुमचा व्यवसाय तुम्हीच ठरवा, नाविन्यपूर्ण उत्पादन घ्या आणि मार्केटिंग शिका. दर्जा टिकवा आणि ग्राहकांचा विश्वास जिंका.” त्यांनी बचत गटाला गावाचा खरा कणा संबोधून, आपल्या भाषणातून बहिणीच्या मायेला साद घालत सभागृहात एक भावनिक लहर निर्माण केली.
म्हसावद येथे १ कोटींचा ‘बहिणाई मार्ट’ उभारणार
महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांसाठी हक्काची बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने म्हसावद येथे १ कोटी रुपये खर्चाने ‘बहिणाई मार्ट’ उभारण्यात येणार असल्याची घोषणाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केली. लवकरच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
८७ लाखांचे धनादेश वाटप
या कार्यक्रमात वसंत वाडी, वडली, विटनेर, वावडदा, बिलवाडी, पाथरी-कुऱ्हाडदे, बिलाखेदा, वराड बु. व डोमगाव येथील महिला बचत गटांना ८७ लाख रुपयांचे स्वयंसहायता व गुंतवणूक निधीचे धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
‘लखपती दीदी’साठी जबाबदारी आवश्यक
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी महिलांच्या कार्याचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “महिला संधीचं सोनं करतात. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून उभा राहत असलेला ‘बहिणाई मार्ट’ हा जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरेल. लखपती दीदी बनण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा आणि जबाबदारीने व्यवसाय वाढवावा.”
या कार्यक्रमाला माजी महापौर विष्णू भंगाळे, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालक राजू लोखंडे, गटविकास अधिकारी श्वेता पालवे, माजी जिप सदस्य पवन सोनवणे, उपजिल्हा प्रमुख रवी कापडणे, अभियान व्यवस्थापक हरेश्र्वर भोई, सरपंच अनिल पाटील, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, समाधान पाटील, बचत गट अधिकारी रविंद्र सुरवंशी, शितल चिंचोरे, सचिन पाटील, संदीप सुरळकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील व मालुताई पाटील यांनी केले. प्रास्ताविक रवींद्र सूर्यवंशी यांनी केले, तर आभार विजया पाटील व संगीता पाटील यांनी मानले. लेखा-जोखा प्रतिभा पाटील यांनी सादर केला. यावेळी आशा पाटील, हिराबाई गोपाळ, सोनाली पाटील, पल्लवी जाधव व वंदना पाटील यांनी आपले प्रेरणादायी अनुभव कथन सादर केले.