मनसेची राजकीय भूमिका पटत नाही – प्रकाश आंबेडकर

107310186 rajthackeray prakashambedkar

मुंबई, वृत्तसंस्था | विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत जाणार नसल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. मराठी माणसासोबत जाण्याची मनसेची भूमिका पटत नसल्याचेही ते म्हणाले. येथे आज (दि.१९) आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

विधानसभा निवडणुकीदरम्यान मनसेला सोबत घेणार नाही. तसेच या निवडणुकांसाठी मुस्लीम समाजाचे २५ उमेदवार देणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले. यापूर्वीही त्यांनी आपली मनसेसोबतची भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही राष्ट्रवादी आहोत, तसेच आम्ही मनसेसोबत जाणार नाही. आमचा दृष्टीकोन प्रादेशिक नाही आणि धार्मिकही नाही, असेही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वीच वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये काडीमोड झाला होता. त्यानंतर एमआयएमकडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली होती. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये बोलताना ही घोषणा केली. यावेळी त्यांनी आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंत व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत एमआयएमबरोबर हातमिळवणी केल्यानंतरही मुस्लीम मते वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये काडीमोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यावर बोलताना “एमआयएमचे दरवाजे आम्ही बंद केले नाहीत. त्यांनीच ते बंद केले. त्याची चावीही एमआयएमकडेच आहे,”असे आंबेडकर म्हणाले.

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. आंबेडकर यांच्याकडे ९८ जागांची मागणी केली होती. पुढे त्यात बदल करून किमान ७४ जागा तरी द्याव्यात, अशी विनंती केली होती. पण दोन वेळा चर्चा होऊनही जागांबाबतचे निर्णय होऊ शकला नव्हता. अ‍ॅड. आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात दोनवेळा बैठका झाल्या तर खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत काडीमोड झाला.

Protected Content