चाळीसगाव, प्रतिनिधी | सलग गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाने होरपळणाऱ्या तालुक्यातील शेतकरी बांधवाना दिलासा मिळावा, यासाठी रोहिणी येथे मंगेश चव्हाण मित्रपरिवाराने लोकसहभागातून चारा छावणी उभारली होती. या छावणीमुळे शेतकरी व जनावरांना भक्कम आधार मिळून दिलासा लाभला होता.
कुठलेही शासकीय अनुदान न घेता लोकसहभागातून अतिशय कमी कालावधीत ही चारा छावणी उभी राहिली. जवळपास १३०० मुक्या जनावरांच्या चारा पाण्याची व्यवस्था आणि शेतकरी बांधवांना एकवेळचे जेवणाचे अखंड दोन महिने नियोजन करता आले. वारकरी आईवडिलांचे संस्कार आणि शेतकरी पुत्र या नात्याने आपणही काही समाजाचे देणे लागतो याच निर्मळ भावनेने हा उपक्रम राबवण्यात आला होता.