नाथाभाऊंनी भाजपाचा बेगडी बुरखा फाडला : डी. जी. पाटील

dfa5ec50 c03b 4190 b607 eaf740d8ecb4

धरणगाव (प्रतिनिधी) माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या वक्तव्याने भाजपाचा बेगडी बुरखा टराटरा फाडला असून भाजपा सरकार अंबानी कुटुंबियांसाठी अल्पसंख्याक समाजाला वेठीस धरत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील यांनी केला आहे. खडसे राज्य हादरवणारा खुलासा करणार असे म्हणत होते, त्याचीच ही सुरवात असावी असाही कयास त्यांनी व्यक्त केला.

 

या बाबत सविस्तर वृत्त असे की, सावदा जिल्हा जळगाव या ठिकाणी मुस्लिम समाजाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जळगाव जिल्ह्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी वक्तव्य केले होते की, मुस्लिम समाजाच्या जमिनीवर अंबानीचा बंगला उभा असून तो बंगला जमीनदोस्त करून ती जागा मुस्लिम समाजाच्या ताब्यात द्यावी, असा प्रयत्न केल्यामुळे माझ्यावर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची अवकृपा झाली. माझं मंत्रिपद काढून घेतलं. त्यांनी केलेले वक्तव्य खरे असेल तर या निमित्ताने त्यांनी भारतीय जनता पक्षाचा मुखवटा टराटरा फाडला असून पक्षाचा खरा चेहरा बाहेर आला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी. जी. पाटील यांनी दिली आहे. नाथाऊंसारख्या पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने भाजपा धनदांडग्या अंबानी सारख्यांना संरक्षण देण्याचे काम करीत आहे, हे या निमित्ताने उघड केलेले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना याविषयी खुलासा करणे क्रमप्राप्त आहे. मुस्लिम समाजाची तुम्ही मतं मागतात आणि अंबानी सारख्यांना संरक्षण देतात, सवलती देतात हे चिंताजनक असल्याचे ते म्हणाले. एक हजार कोटी रुपयांची जमीन फुकट घेऊन मुस्लिम समाज आणि शासनाचे मोठे नुकसान त्या काळात भाजपने केलेले आहे. त्यामुळे या गोष्टीचा खुलासा भाजपने केलाच पाहिजे, असे म्हणत त्यांनी या विषयावर सर्वधर्मसमभाव मानणारे सर्व कार्यकर्ते नाथाभाऊ यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले. खडसेंनी स्पष्ट भूमिका घेतली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली.

Add Comment

Protected Content