खासदारांनी सोडवले ‘पाचोरा जागृत जनमंच’चे उपोषण

पाचोरा प्रतिनिधी | खासदार उन्मेष पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पुलाजवळचे काम सुरू करण्याचे आदेश अभियंत्याला दिल्यावर अपघाताचं कारण ठरत असलेल्या पाचोरा भडगाव दरम्यान तितूर नदीजवळील रस्त्याचं काम अर्धवट पूर्ण करावं या मागणीसाठी पाचोरा जागृत जनमंच’ने सुरु केलेले उपोषण सोडण्यात आले.

पाचोरा भडगाव दरम्यान तितूर नदीजवळ भडगावकडून येणारा रस्ता अचानक थांबला. आणि पुढे नदीची २० फूट खोल खाईत भडगाव कडून वाहन आले की, सरळ खाईत जाऊन पडत असे. काही तर उजवीकडे वळून विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाला ठोकत. असे एकूण ४० अपघात झाले. पैकी १२ लोक मरण पावले. आताच १९ जानेवारीला नाचणखेडाचा १९ वर्षाचा तरुण मुलचा याकारणाने अपघातात मृत्यू झाला.

या अर्धवट सोडलेल्या रस्त्यावर ‘जळगाव जिल्हा जागृत जनमंच’चे अध्यक्ष शिवराम पाटील व ‘पाचोरा जागृत जनमंच’चे अध्यक्ष निलकंठ पाटील यांनी एक महिन्यापूर्वी व्हीडीओ चित्रण घेऊन ही समस्या प्रसारीत केली होती. कोणी दखल न घेतल्याने सोमवार, दि.२४ जानेवारीपासून अपघातस्थळी निलकंठ पाटील व गुलाब पाटील यांनी उपोषण सुरू केले होते. धुळे व जळगावच्या संबंधित अभियंत्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्ष जागेवर काम अर्धवट सोडल्याचे लक्षात आल्याने संघटना अडून बसली. आज खासदार उन्मेष पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन जागेची पाहणी केली. उद्याच पुलाजवळचे काम सुरू करण्याचे आदेश अभियंत्याला दिल्यावर संघटनेच्या नेत्यांचे समाधान झाले.

निळकंठ पाटील व गुलाब पाटील यांनी खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते आज साडेतीन वाजता उपोषण सोडले. शिवराम पाटील व ईश्वर मोरे यांनी आधिकारी व नेत्यांची सुत्रे हलवली. खासदार उन्मेष पाटील यांनी रस पाजून सोडवले. आमदार किशोर पाटील व अमोल शिंदे यांनी याकामी सहकार्य केले.

Protected Content