बोदवड नगरपंचायतीवर भव्य मोर्चा

bodvad morcha

बोदवड प्रतिनिधी । शासनाने दिलेले प्लॉट व भोगवटा कायमकरून सिटी सर्व्ह मध्ये नोंद करण्यात यावी यामागणी साठी बोदवड नगरपंचायत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

बोदवडमधील म्हसोबा मंदिर येथून शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्च्या काढण्यात आला. शासनाने दिलेले प्लॉट व भोगवटा कायमकरून सिटी सर्व्ह मध्ये नोंद करण्यात यावी या मागणी साठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी कार्यालयीन अधिक्षक तसेच प्रशासकीय अधिकारी कार्यलयामध्ये हजर नसल्यामुळे मोर्चेकर्‍यांनी कार्यालयाचा ताबा घेत एक तास ठिय्या आंदोलन केले. यानंतर तहसीलदार रवींद्र जोगी यांना नगरपंचायत कार्यालयात बोलावून नगराध्यक्ष मुमताजबी बागवान व तहसीलदार रविंद्र जोगी यांना आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले

या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने बेघर लोकांसाठी कायम निवार्‍यासाठी गावठाण जवळील संपादित क्षेत्रामध्ये ९५ घरकुले बांधून दिले. तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाने भूमिअभिलेख न कार्यलयामध्ये नोंद सुद्धा करून देण्यात आली. यानंतर १९९४ ला ३६ घरकुले बांधून संबंधित लाभधारक नागरिकांना शर्तीवर ते क्षेत्र कायम देण्यात आले. यानंतर बेघर लोकांनी बोदवड गावठाण ५७९/२ व गट न. ५८०/२ यागावठाण क्षेत्रातील जागेवर ३४८ लोकांचे राहवास प्रयोजनर्थी अतिक्रमण होती. तरी सदर अतिक्रमण धारकांनी आपले अतिक्रमण कायम करण्याबाबत उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्याकडे अर्ज केलेले होते. त्यानुसार अधिनियम १९६६ चे कलम ५० व ५१ तसेच १९७१ चे नियम ४३ नुसार दर्शविले प्रमाणे १९९९ च्या बाजारभाव च्या किमतीप्रमाणे मागासवर्गीय नागरिकांसाठी विहीत आकारणी करण्यात आलेली होती. तसेच इतर नागरिकांसाठी अडीच पट रकमेने अतिक्रमित भोगवटा धारक मूल्याच्या दराप्रमाणे पट आकारणी केली होती. यानुसार १९९९ मध्ये अतिक्रमित व भोगवटा धारकांना रहिवासी निश्‍चित करण्यात आला होता त्यानुसार त्यांचे प्लॉट व भोगवटा धारकांचे क्षेत्रफळ यांची मोजणी करून त्यांची क्षेत्र निश्‍चित करून त्यांच्या कडून त्या क्षेत्रफलाचे मूल्य शासनास अदा केले होते. त्यावेळी मोजलेले भूमिअभिलेखन कायम करण्यात यावे तसेच
येथे पायाभूत सुविधा उभारण्यात याव्या व रहिवास करत असलेले भोगवटा व प्लॉट यांची भूमिअभिलेखन नोंद कायम करण्यात यावी अशा मागण्या यात करण्यात आलेल्या होत्या.

या मागणी संदर्भात नगरपंचायत प्रशासनाने म्हटले की, गट क्र ५७९ व ५८० मधील लोकांना सरकारने जमीन दिलेले असून त्यांच्याकडे बिनशेती आदेश व अभिण्यासाची प्रत उपलब्ध नाही यासाठी उपविभागीय अधिकारी भुसावळ यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. तसेच सद्यस्थितीत मंजूर घरकुल लाभार्थी ना परवानगी तात्काळ मिळावी यासाठी नगररचना व मूल्य निर्धारण विभाग जळगाव यांचे अभिप्राय मिळणेसाठी सदर लाभार्थी यांची संचिका सादर करण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०१८ मधील शासन निर्णयानुसार बेघर वस्ती लोकांना घरकुलचा लाभ घेता यावा यासाठी कन्सल्टन्सीची नेमणूक करण्यात आली असून लवकरच बेघर लोकांच्या जागेचा सर्व्ह करून प्रधानमंत्री आवास योजनेबाबत लाभ देण्यात येईल असे लेखी आश्‍वासन नगरपंचायतने दिले.

या मोर्च्यात तालुकाप्रमुख गजानन खोडके,उपजिल्हा संघटक असलम भाई सुनील पाटील,शांताराम कोळी,गोपाल पाटील,नईम बागवान, हर्षल बडगुजर, निलेश माली, शेख कलिम शेख, नाना माळी, राहुल माळी, विकी शर्मा, विमलबाई यासह उशाबाई ,लताबाई माळी आदींसह नागरिक सहभागी झाले होते.

Protected Content