मुंबई (वृत्तसंस्था)। भारतीय हद्दीत घुसलेली पाकिस्तानची विमाने भारतीय वायूसेनेने पिटाळून लावल्यानंतर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला चर्चेचे निमंत्रण दिले आहे. या निमंत्रणवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाहन करत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानशी चर्चा करण्याची संधी सोडू नये, पाकिस्तानची खरंच चर्चेची तयारी असेल तर त्यासाठी पहिले पाऊल हे त्यांनीच उचलायला हवे. पाकने वैमानिक अभिनंदन यांना तात्काळ सोडले पाहिजे. या गोष्टी घडल्या तरच म्हणता येईल इम्रान खान यांचे हेतू स्वच्छ आहेत, असे राज ठाकरे यांनी गुरुवारी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
भारतीय हवाई हल्ल्याने जो हल्ला चढवला आहे त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो, मात्र या पार्श्वभूमीवर पाकिस्थानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी चर्चेसाठी पुन्हा आवाहन केले आहे. सोबत पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यापासून सर्व मुद्द्यावंर चर्चेस तयारी पाकने दर्शविली आहे. अशा प्रकारे चर्चेतून मार्ग काढण्याची संधी स्व. अटलबिहारी वाजपेयीजी आणि परवेज मुशर्रफ यांच्या काळात आली होती. अटलजींनी सदा-ए-सरहद ही लाहोरपर्यंतची बससेवा सुरू केली. समझौता एक्स्प्रेस सुरू केली. जी संधी अटलजींच्या काळात दोन्ही देशांच्या हातातून निसटली आहे. ती संधी पुन्हा आपल्यासमोर आहे. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया ही दोन कट्टर शत्रूराष्ट चर्चेतून मार्ग काढण्यासाठी पुढे येऊ शकतात तर आपण का नाही येऊ शकत ? असा सल्ला वजा आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.