मोदी-पवार की मुलाकात हुयी, क्या बात हुयी ?

modi pawar bhet

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | राष्ट्रपती राजवट लागलेल्या महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नसताना राजकीय आघाडीवर रोजच्या रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेला एकत्र आणण्याच्या प्रयत्नात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर तातडीने भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही मोदींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. महाराष्ट्रात नेमके काय होणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

 

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रश्नावर शरद पवार हे आज पंतप्रधानांची भेट घेणार होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसे स्पष्टही करण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे त्यांनी ही भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल पाऊणतास चर्चा झाली. पवारांनी स्वत: ट्विट करून या चर्चेचा तपशील सांगितला आहे. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील ३२५ तालुक्यांतील ५४.२२ लाख हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही परिस्थिती मी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिली,’ असे पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या, अशी मागणीही पवारांनी यावेळी केली.

शरद पवारांनी ट्विट करून भेटीचा तपशील सांगितला असला तरी राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. मोदी व पवारांच्या भेटीनंतर अमित शहा यांनी तातडीने मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. पवारांनी मोदींकडे मांडलेल्या शेतीचे प्रश्न कृषी व अर्थ खात्याशी संबंधित होते. या प्रश्नाशी शहा यांच्या खात्याचा थेट संबंध येत नाही. त्यामुळे शहा-मोदींच्या भेटीकडे वेगळ्या नजरेतून पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आपसात सल्लामसलत करूनच महत्त्वाचे राजकीय निर्णय घेतात, असे बोलले जाते. महाराष्ट्रातील पुढील राजकारणाबाबत पवारांनी भाजपपुढे एखादा फॉर्म्युला ठेवला असल्यास त्यावर दोघांमध्ये चर्चा झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.

Protected Content