सर्वसामन्यांसह आमदारांना मिळणार घरे – अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची घोषणा  

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांसाठी 300 आणि सर्वसामान्य मुंबईत राहणाऱ्या कष्टकऱ्यांसाठीही घरं बांधणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनातील आपल्या पहिल्या भाषणात केली.

मुख्यमंत्री यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्र्यांनी छोटं का होईना पण भाषण केलं याचा आनंद असल्याचा उल्लेख करत मुंबईत झालेल्या घोटाळ्यांची यादी वाचत सरकारवर टीका केली.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याने घेतलेल्या नव्या निर्णयावर व्यक्त होत  मुंबईतील गरिबांना हक्काची घरं मिळायलाच हवीत, सरकारचीही तशीच भूमिका आहे, असं सांगितलं. त्याअगोदर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नांना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तरं दिली.

याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुंबईत राहणारे कष्टकरी आहेत. कष्टकरी दुसऱ्यांची घर बांधतात, मात्र त्यांना पाठ टेकायला घर नसतं.  १९९५ मध्ये सत्ता होती त्यावेळी योजना आणली होती. यापूर्वी मुंबईच्या विकासाचा विचार केला नव्हता. केंद्र सरकारमुळे धारावीचा विकास होऊ शकला नाही. मुंबईला नेहमीच सोन्याचं अंडे देणारी कोंबडी म्हणून विचार केला. तिची निगा राखण्याचा विचार कोणी केला नव्हता तो विचार आम्ही केला. काही योजना जाहीर केल्या मात्र काही योजनांचा विचार केला नव्हता.  धारावीचा विकास होऊ शकला नाही कारण जमीन हस्तांतरण बाकी आहे. लोकांच्या घरांचा प्रश्नासोबत  लोकप्रतिनिधी यांच्या घराचा ही प्रश्न आहे.  आमदारांना घरेही मिळणार असून  त्यासाठी 300 घरं बांधणार आहोत, सर्वपक्षीय आमदारांना घरं आवश्यक आहेत, आमदारांनाही चांगल्या घरांची गरज, कायमस्वरुपी घरं देणार, असं मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर सरकारवर टीका केली. “या सरकारने बांधावर जाऊन हेक्टरी ५० हजार रुपये मिळायला हवे असं आश्वासन दिलं होतं, त्याबद्दल आता बोलायला नको. ना नवे प्रकल्प, ना नवे योजना, सुरु प्रकल्प बंद, केवळ टीका, आरोप, टोमणे या पलिकडे काहीच नाही असं म्हणत त्यानी कवी विंदां करंदीकर आणि पी.एल.बामनिया यांची कविता सादर करत आघाडी सरकारवर टीका केली.

Protected Content