शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आ. अमोल जावळे विधानसभेत आक्रमक


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आमदार अमोल जावळे यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात प्रभावीपणे मांडला. शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळत नसल्याने होणाऱ्या अडचणींकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

आमदार जावळे यांनी सभागृहात स्पष्टपणे सांगितले की, “शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका सरकारची असली तरी, कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून होणाऱ्या पत्रव्यवहारात मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होते. यामुळे नुकसान भरपाई वेळेवर मिळत नाही आणि शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.” कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

जून-जुलै २०२३ मध्ये झालेल्या वादळात अनेक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र, संबंधित शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ही गंभीर बाब असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

नुकतेच २९ जून २०२५ रोजी झालेल्या वादळात सुमारे ९०० हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार जावळे यांनी सरकारकडे मागणी केली की, या नुकसानीची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.