राज्यात केव्हाही ‘मध्यावधी’ची शक्यता : सुप्रिया सुळे

 

कराड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेच्या कालखंडात केव्हाही मध्यावधी निवडणुका लागू शकतात असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

आज कराड येथील दौर्‍यावर असतांना सुप्रीया सुळे यांनी सत्ताधार्‍यांवर जोरदार टीकास्त्र सोडतांनाच हे सरकार अल्पायुषी असेल असा दावा केला आहे. त्या म्हणाल्या की, आज लहान मुलेही ‘ईडी’बाबत गमतीने बोलतात. ५० खोक्यांचीही सर्वत्र चर्चा होते. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. यामुळे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचे नाव कमी होत असून, फार मोठी कुचेष्टा होत आहे. त्यामुळे आम्हाला अस्वस्थ वाटते, वेदना होतात.

राज्य सरकार किती दिवस टिकेल या प्रश्नावर त्या म्हणाल्या, पांडुरंगाचीच इच्छा एवढेच म्हणायचे राहिले आहे. आजकाल ज्या पद्धतीने कारभार होतोय, अनेक गोष्टी घडतायेत. ते चुकीचे आहे. शासनाला विकासाबाबत चर्चा करता येते की नाही? हा प्रश्न पडला आहे. राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका होऊ शकतात असे भाकीत देखील सुप्रीया सुळे यांनी याप्रसंगी केले.

Protected Content