नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथील माहेर असलेल्या एका २० वर्षीय विवाहितेला मुंबई येथे सासरच्या मंडळींकडून कौटुंबिक वादातून शिवीगाळ, मारहाण आणि शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात विवाहितेने शुक्रवारी, ९ मे रोजी दुपारी दोन वाजता पतीसह सासरच्या आठ जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
नशिराबाद येथील माहेर असलेल्या प्रियंका शिवा खरात (वय २०) यांचे जानेवारी २०२४ मध्ये मुंबई येथील शिवा दिनकर खरात यांच्याशी पारंपरिक पद्धतीने लग्न झाले होते. तक्रारीनुसार, लग्नाच्या केवळ तीन महिन्यांतच तिला किरकोळ कारणांवरून शिवीगाळ आणि मारहाण सुरू झाली. सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून प्रियंका अखेर आपल्या माहेरी, नशिराबाद येथे परत आली आणि तिने शुक्रवारी ९ मे रोजी दुपारी २ वाजता पोलिसात तक्रार दाखल केली.
प्रियंका खरात यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे पती शिवा दिनकर खरात, सासरे दिनकर मारुती खरात, सासू अनिता दिनकर खरात, चुलत जेठ रमेश खरात, मोठी सासू कलाबाई खरात, ननंद जयाबाई जाधव, लक्ष्मी देविदास अंभोरे आणि ज्योती विनोद वाघमारे (सर्व राहणार मुंबई) यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल फकीरा रंधे करत आहेत.