मराठा क्रांती मोर्चा निवडणुकीच्या रिंगणात नाहीच : बच्छाव (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकार्‍यांनी लोकसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा केली असली तरी जिल्ह्यात मात्र कुणी मोर्चाकडून निवडणुकीच्या रिंगणात नसेल अशी स्पष्टोक्ती प्रा. डी.डी. बच्छाव यांनी दिली आहे.

मराठा क्रांती मोर्चा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा अलीकडेच पक्षाचे राज्य समन्वयक विनोद पोखरकर आणि अन्य पदाधिकार्‍यांनी केली होती. या पार्श्‍वभूमिवर, जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये मराठा क्रांती मोर्चा उतरणार का ? याबाबत औत्सुक्याचे वातावरण निर्मीत झाले आहे. या पार्श्‍वभूमिवर, क्रांती मोर्चाचे पदाधिकारी प्रा. डी.डी. बच्छाव यांचे मत जाणून घेतले असता, त्यांनी आमच्यातर्फे कोणताही उमेदवार उभा राहणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले की, कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात बदल, शेतकरी कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. यात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. मराठा क्रांती मोर्चा हा अराजकीय स्वरूपाचा असून कुणाला जर निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे असल्यास त्यांनी खुशाल कोणत्याही राजकीय पक्षाच्या माध्यमातून उतरावे. मात्र मराठा क्रांती मोर्चा लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे प्रा. बच्छाव म्हणाले.

पहा– प्रा. डी. डी. बच्छाव नेमके काय म्हणालेत ते !

Add Comment

Protected Content