मला हरवायला ठाकरेंनी पैसा वाटला: अभिजीत बिचुकलेंचा खळबळजनक आरोप

71

मुंबई वृत्तसंस्था । ‘मला हरवायला ठाकरे कुटुंबीयांना पैसा वापरावा लागला’ असा खळबळजनक आरोप ‘बिग बॉस’ फेम कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकलेंनी केला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंनी अपक्ष उमेदवारी करत वरळीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.

अभिजीत बिचुकले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे कुटुंबीयांवर हे आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने वरळीतून तब्बल चार कोटींची रक्कम जप्त केली. ही रक्कम अभिजीत बिचुकलेंना हरवण्यासाठी वापरण्यात आल्याचा दावा त्यांनी या मुलाखतीत केला आहे. ‘वरळीतून मी उमेदवारी अर्ज भरला मी मुंबईत आलो, मला मुंबईकरांनी प्रचंड प्रेम दिले. माझी लोकप्रियता पाहून मला पाडण्यासाठी पैसे वाटण्यात आले.’ असं बिचुकले म्हणाले.

राजकारणातील नेते हेच सगळ्यात मोठे अभिनेते असतात असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. हे राजकीय नेते गंडवागंडवी करतात. लोकांना फसवतात, उद्धव ठाकरे १० रुपयात कशी थाळी देतात हे मला पाहायचेच आहे असंही त्यांनी ठामपणे सांगितले. एकीकडे ठाकरे कुटुंबीयांवर टीका करत असताना दुसरीकडे मात्र ते आदित्य ठाकरेंविरोधात निवडणुकीला उभं राहिल्यानंतर शिवसेनेकडून किंवा ठाकरे कुटुंबीयांकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला नाही किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही हे मात्र त्यांनी कबूल केले.

दरम्यान, अभिजीत बिचुकले यांनी वरळी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि ठाकरे कुटुंबीयांना आव्हान दिले. ‘ माझ्यामुळे आदित्य समोरचं आव्हान वाढलं आहे. तुम्ही मला निवडून द्या मी प्रशासनाला एका दिवसात सरळ करतो’ असंही बिचुकले म्हणाले. अभिजीत बिचुकले साताऱ्यातूनही विधानसभा निवडणूक लढवली. भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात बिचुकलेंनी अर्ज दाखल केला होता. इतकंच नव्हे तर त्यांची पत्नी अलंकृता बिचुकले भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या उदयनराजेंविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढविली.

Protected Content