‘मैत्रेय’ फसवणूक प्रकरण : वर्डीयेथील ठेवीदारांची पंतप्रधानांकडे तक्रार

चोपडा , प्रतिनिधी । राज्यासह देशभरातील सुमारे २० लाख ठेवीदारांकडून २१०० कोटींची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या आर्थिक घोटाळा प्रकरणाची स्थिती नेमकी काय आहे ? हे अजूनही गुंतवणूकदारांना ठाऊक नसल्यामुळे सामान्य जनतेमध्ये संभ्रमावस्था आहे. चोपडा तालुक्यातील वर्डी येथील १६ गुंतवणूकदारांनी थेट पंतप्रधान,केंद्रीय गृहसचिव,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे ई-मेलद्वारे तक्रार केल्याने या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

मध्यमवर्गीयांनी कमाईतील रक्कमेचा काही हिस्सा बचत म्हणून मैत्रेय प्लॉटर्स अ‍ॅण्ड कंस्ट्रक्शन प्रा.लि., मैत्रेय रिएक्टर्स अ‍ॅण्ड कंट्रक्शन प्रा.लि.,या कंपनीचा जळगाव शाखेत ठेवली होती. या ठेवीची मुदत संपल्यानंतर कंपनीकडून कुठल्याही स्वरूपाचा परतावा देण्यात आला नाही. ठेवीच्या रक्कमेसाठी कागदपत्रांची वेळोवेळी पूर्तता केली असून, अद्याप रक्कम मिळालेली नसल्याची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ई-मेलद्वारे पाठवली आहे. याची दखल घेत केंद्रीय गृहसचिवांनी तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्याचे गृहसचिव,वित्त विभाग तसेच सामाजिक न्याय विभाग यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गुंतवणूकदारांना दुप्पट पैसे तर नाहीच, शिवाय मुद्दलही मिळत नसल्याने ठेवीदारांनी पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणात फसवणुकीबद्दल राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जळगाव जिल्हातील हजारो नागरिकांनी मैत्रेय कंपनीमध्ये कोट्यावधीची गुंतवणूक केल्याचे समोर आले होते. याप्रकरणात फक्त नाशिक जिल्ह्यात मैत्रेय कंपनीच्या ठेवीदारांना दीड कोटी वाटप झाले. या प्रकरणातील फसवणूक झालेल्या जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आपली गुंतवणूक ठेवीची रक्कम दिली जाणार आहे, असे सांगण्यात आले होते तसेच ज्या गुंतवणूकदारांनी तक्रार केली नसेल त्यांनी जिल्ह्यातील संबंधित पोलीस स्टेशनला पॉलिसीची माहिती नमुन्यात भरून ती पेन ड्राईव्हमध्ये भरून आणावी असे आवाहन गुंतवणूकदारांना त्यावेळी प्रशासन तसेच कंपनीच्या वतीने करण्यात आले होते.

चोपडा तालुक्यातील वर्डी येथील या गुंतवणूकदारांना केली तक्रार

शांताराम जयसिंग कोळी, इंदूबाई मच्छिंद्र धनगर, राजेंद्र पुरुषोत्तम सुतार, राधाबाई महारू पाटील, उषाबाई प्रताप धनगर, हिलाल शिवराम पाटील, राजेंद्र अमृत सोनवणे, सुरेश अभिमन धनगर, रंजनाबाई पांडुरंग पाटील, पुरूषोत्तम अभिमन धनगर,आनंदा रामदास धनगर, रुख्याबाई नारायण बागुल, विजुबाई राजेंद्र पाटील, कल्पना राजेंद्र मिस्तरी, तुकाराम अमृत कुंभार, रविंद्र मच्छिंद्र धनगर.

Protected Content