मुंबई प्रतिनिधी । राज्यातील सत्ता गुंता लवकरच सुटण्याची चिन्ह दिसत आहेत. तसे संकेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या मागे संपूर्ण भाजप खंबीरपणे उभी असून, त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे, असा दावा त्यांनी केला. शिवसेनेकडून अद्यापपर्यंत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्या प्रस्तावासाठी भाजपाची दार खुली आहेत, असे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच पुढची रणनीतीही ठरविण्यात आली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही लवकरात लवकर राज्यात सरकार स्थापन करणार आहोत. जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. त्यामुळे जनतेच्या जनादेशाचा आदर केला जाईल. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं सरकार स्थापन करण्यात येणार आहे, यात शंकाच नाही, असं सांगतानाच शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्यासाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्या प्रस्तावासाठी भाजपची दार खुली आहेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.