मुंबई प्रतिनिधी । सरकारने अण्णा हजारे यांच्या मागण्या मान्य न केल्यास आपण रस्त्यावर उतरून मंत्र्यांच्या गाड्या फोडू असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
तृप्ती देसाई यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाला पाठींबा दिला आहे. याबाबत त्या म्हणाल्या की, अण्णांचे उपोषण हे सर्वसामान्यांसाठी आहे. लोकांसाठी अण्णांना वारंवार उपोषणाला बसावं लागतं. अण्णा उपोषणाला बसल्यानंतर सहा दिवसांपर्यंत उपोषण सुटत नाही म्हणजे काय? यावरुन हे सरकार गेंड्याच्या कातडीचे असल्याचं सिद्ध होतं. अण्णांचं वय पाहता मुख्यमंत्र्यांनी निरोप पाठवण्याऐवजी स्वतः निर्णय घेऊन इथं येणं अपेक्षित होतं. अण्णांच्या उपोषणाबाबत अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलत नाहीत. बॉलिवूडच्या कलाकारांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटोसेशन करण्यासाठी मोदींकडे वेळ आहे. मात्र, अण्णांनी चर्चेला एक वाक्य बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही? अस असेल तर तुमच्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही. आपण तातडीने या मागण्या मान्य कराव्यात नाहीतर आमच्यासारख्या महिला संघटना देखील आक्रमकपणे रस्त्यावर उतरतील आणि वेळ पडल्यास मंत्र्यांच्या गाड्या फोडून सरकारला धडाक शिकवू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी सरकारला दिला आहे.