१ जानेवारीपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होणार : सोमय्या

मुंबई प्रतिनिधी | राज्य सरकारमधील मंत्र्यांचे अजून घोटाळे बाहेर काढण्याचे सूतोवाच करतांनाच आगामी १ जानेवारीपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त असेल असा दावा माजी खासदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

आज एका सांस्कृतीक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की,  ज्या पद्धतीनं मोदींनी देशातील सर्वांचं ३१ डिसेंबरपर्यंत कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. १ जानेवारी रोजी भारत कोविडमुक्त असणार आणि आमचं तर महाराष्ट्रासाठी कमिटमेंट आहेच. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील ४० चोरांचे घोटाळे काढून १ जानेवारीला महाराष्ट्र घोटाळामुक्त असेल. दिवाळी आज आहे. परंतु पाडवा १ जानेवारी रोजी असेल, असं किरीट सोमय्या म्हणाले.

सोमय्यांनी नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार असल्याचा आरोप केला आहे. ठाकरे सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आर्थिक व्यवहार, उलाढाल आश्चर्य उत्पन्न करणारी आहे. तसेच पवारांचे मित्र, बिल्डरांकडून अजित पवार आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची (शंभरहून अधिक) अपारदर्शक नामी आणि बेनामी आवक असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे. मोहन पवार हे जरंडेश्वर साखर कारखान्याचे एक मालक आहेत. पवार परिवाराचे जावई आणि अन्य सदस्यांच्या खात्यात कोट्यावधी रुपयांची ट्रान्सफर झाल्याची खळबळजनक माहिती सोमय्या यांनी ट्विटरवर दिली होती.

Protected Content