नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीसाठी आज सात राज्यांमधील ५९ मतदारसंघांमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत 25.13 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, बंगालमधील मतदानाला हिंसेचे गालबोट लागले आहे. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी बंगालमधील झारग्राम येथे भाजपाच्या एका बूथ कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. तसेच मरधारा येथील कांठीमध्ये टीएमसीच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे.
मतदानाची ही सहावी फेरी असून बिहार, झारखंड, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल अशा सात राज्यांचा समावेश आहे. या टप्प्यात केंद्रीय मंत्री मनेका गांधी, गौतम गंभीर, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, मनोज तिवारी, काँग्रेसचे ज्योतिरादित्य शिंदे, दिग्विजय सिंह, शीला दीक्षित, विजेंदर सिंह, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद होणार आहे. किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान सुरु आहे. परंतु दुसरीकडे बंगालमध्ये मात्र, मतदानापूर्वी येथे हिंसाचाराने डोके वर काढले आहे. बंगालमधील झारग्राम येथे भाजपाच्या एका कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला आहे. रामोन सिंह असे या मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी हत्येचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, अन्य दोन भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला.