पारोळा (प्रतिनिधी)। तालुक्यातील होळपिंप्री भागातील खळवाळीस भीषण आग लागल्याची घटना काल (दि.२२) दुपारी ४.०० च्या सुमारास घडली. या घटनेतील जागेत होळपिंप्री, रत्नापिंप्री येथील ३० ते ३५ शेतक-यांची गुरे-ढोरे बांधण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी सर्व शेतक-यांची शेतीची अवजारे, चारा, बैलगाडी व गुरे होती. हे सगळे या आगीत पुर्णपणे जळून खाक झाले असून यात शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. दुपारी अचानक आग लागल्याचे कळताच रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
तरूणांनी आग विझवण्यासाठी परीश्रम घेतले तरीही आग आटोक्यात येत नसल्याचे लक्षात आल्यावर पारोळा व अमळनेर येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी दोन्ही तालुक्यातील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आग विझवण्यास यश आले. यावेळी गृप ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरेश पाटील, विजय पाटील, रत्नापिंप्रीचे पोलिस पाटील प्रभाकर पाटील, होळपिंप्री पोलिस पाटील गौतम भालेराव, दबापिंप्रीचे पोलिस पाटील प्रकाश भागवत, रामचंद्र पाटील, किशोर वाघ आदींनी वरीष्ठांना आगीची सुचना देवून अग्निशमन दलाला पाचारण केले होते. तसेच रत्नापिंप्री, होळपिंप्री, दबापिंप्री येथील ग्रामस्थांनीही आग विझवण्यात प्रयत्न केले. या आगीच्या सुदैवाने जिवित हानी झाली नसली तरी शेतक-यांच्या सगळा शेती माल जळून खाक झाला आहे. रत्नापिंप्री येथिल मतदान केंद्र क्रमांक २७२ हे ज्या आंगणवाडीत आहे. त्याच्या भिंतीला लागूनच असलेल्या या खळवाडीला ही आग लागली होती. यात मतदान केंद्राचे नुकसान झाले नसले तरी या इमारतीची भिंत प्रचंड तापली होती.