केवळ महिनाभर टिकणार हे बेकायदेशीर सरकार : आदित्य ठाकरे

सिंधुदुर्ग-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेला गद्दारांनी धोका दिला असून त्यांचे सरकार बेकादेशीर असल्याने महिनाभरच टिकेल असे प्रतिपादन करत माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून कोकणात सुरू झाला असून याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी विविध मुद्यांवरून सत्ताधारी भाजप व शिंदे गटाचा समाचार घेतला. यात प्रारंभी राऊत यांच्या अटकेबाबत ते म्हणाले, हे महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचं कटकारस्थान आहे आणि हे सर्व जगजाहीर आहे. तुम्ही लिहून घ्या हे सरकार कोसळणार आहे. महाराष्ट्र गद्दारी सहन करत नाही. मी मंत्री म्हणून काम सुरू केलं तेव्हा पहिलं काम कोकणातील पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय घेतला.

सध्या दोन लोकांचं जंबो मंत्रीमंडळ आहे. कोण मुख्यमंत्री, कोण उपमुख्यमंत्री हेच कळत नाही. कुणी कुणाला बोलू देत नाही. सध्या त्यांचं लक्ष घाणेरड्या राजकारणावर आहे. मी आजोबा आणि वडिलांसोबत लहानपणापासून फिरलो, पण इतकं घाणेरडं राजकारण पाहिलं नाही,

दरम्यान, आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, मी आज तुम्हाला इतकंच विचारायला आलो आहे की, हे घाणेरडं राजकारण तुम्हाला पटतंय का? हे सरकार बेकायदेशीर तर आहेच, पण गद्दार आणि बेईमानांचं सरकार आहे. आज देशात बेरोजगारी वाढत आहे, महागाई वाढत आहे. मात्र, महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे, असंही ठाकरेंनी नमूद केलं.

Protected Content