धुळे येथे जमनाबेन लोकसेवक पुरस्कार वितरण सोहळा

धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “मानवासाठी गायीचे दूध, शेण अत्यंत उपयुक्त आहे. गोसेवेचा संस्कार घराघरात रुजणे ही काळाची गरज आहे. ‘घरटी एक गाय’ हे तत्त्व अंगीकारले पाहिजे. गोपालन हा केवळ संस्कार नसून आर्थिक व सामाजिक दृष्ट्याही उपयुक्त आहे. छत्तीसगडमधील गौठान योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सकारात्मक बदल झाला आहे,” असे प्रतिपादन छत्तीसगडमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रदीप शर्मा यांनी केले.

महाराष्ट्र गो विज्ञान समिती, मालेगाव, धुळे आणि गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथे आयोजित कार्यक्रमात प्रदीप शर्मा यांना ‘जमनाबेन कुटमुटिया लोकसेवक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सोहळ्यात नरेश यादव (भूतपूर्व खासदार व लोकसेवक), सेवाग्राम आश्रमाचे मंत्री विजय तांबे, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, ज्येष्ठ सर्वोदयी डॉ. सुगन बरंठ, ‘साम्ययोग साधना’ पाक्षिकाचे संपादक रमेश दाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र गोविज्ञान समिती मालेगाव व धुळे यांच्या आयोजनाखाली तसेच भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने हा पुरस्कार सोहळा ९ मार्च रोजी बर्वे कन्या छात्रालय, धुळे येथे संपन्न झाला. जमनाबेन कुटमुटिया यांनी आपले संपूर्ण जीवन गोसेवेसाठी वाहून घेतले होते. त्यामुळे त्यांचा पुरस्कार धुळ्यातच प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९९९ ते २०१९ या कालावधीत हा पुरस्कार मालेगाव येथे देण्यात आला होता. मात्र, पुढील काळात धुळे येथेच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सत्काराला उत्तर देताना प्रदीप शर्मा म्हणाले, “आमच्या लहानपणी प्रत्येकाच्या घरात गायी असायच्या. त्यामुळे शेतीत प्रोटीनयुक्त कडधान्य पेरले जात असे. मात्र, आजच्या काळात महिला व बालकांमध्ये प्रोटीनची कमतरता दिसते. आमच्याकडे १ कोटी ३० लाख गोवंश आहे, त्यापैकी ६५ लाख गायी आहेत. यातील अडीच लाख महिला गायीच्या शेणापासून खत तयार करतात आणि त्यातून ५२ कोटी रुपयांचे उत्पन्न महिलांना मिळते.” यावेळी माजी खासदार नरेश यादव म्हणाले, “मी स्वतः गोपालक आहे आणि गायींवर प्रेम करतो. मात्र, आधुनिक कृषी तंत्रज्ञानामुळे बैल आणि गायी शेतीतून हद्दपार होण्याची भीती आहे. जैन इरिगेशनच्या आधुनिक शेती प्रयोगांचा अभ्यास केल्यानंतर मला कृषीक्रांतीची खरी जाणीव झाली. जैन इरिगेशनने भूमिपुत्रांसाठी केलेले कार्य स्तुत्य आहे.” त्यांनी ‘उजडते गाव, दम घुटते शहर’ या परिस्थितीवर भाष्य करत, प्रत्येकाने गोसेवेचा वसा घेतला पाहिजे असे आवाहन केले.

सेवाग्राम आश्रमाचे मंत्री विजय तांबे म्हणाले, “गाय आणि महिला सक्षमीकरणाशिवाय परिस्थितीत सुधारणा होणार नाही. ग्रामीण भागात रोजगार निर्माण झाल्यास गायींचे संगोपन होईल आणि गावांचा विकास वेगाने होईल.” गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांची महत्त्वपूर्ण माहिती उपस्थितांसमोर मांडली. त्यांनी सांगितले की, “२०१२ मध्ये गांधी रिसर्च फाउंडेशनची स्थापना झाली. येथे साडेपाच लाख पानांचे साहित्य आणि साडेचौदा हजार दुर्मीळ पुस्तके उपलब्ध आहेत. गांधी विचारांचा प्रसार करण्यासाठी ऑडिओ गाईडेड म्युझियमही स्थापन करण्यात आले आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी नरेश यादव आणि विजय तांबे यांच्या हस्ते प्रदीप शर्मा यांना रुपये ५१ हजारांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. या पुरस्काराची रक्कम त्यांनी हरिजन सेवक संघाच्या बर्वे छात्रालयातील विद्यार्थ्यांसाठी अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपश्चिम बरंठ यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय कळमकर यांनी केले. यावेळी पुरस्कारार्थी प्रदीप शर्मा यांच्या कार्यावर आधारित डॉक्युमेंटरीही दाखवण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मधुकर शिरसाठ, कृष्णा शिरसाठ, अनिता रामराजे, वैशाली पाटील आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.”

Protected Content