जिल्हाधिकारी हे खरे कोविड योध्दे ! : पालकमंत्री

जळगाव (प्रतिनिधी ) : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत Abhijit Raut Birthday यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या दोन्ही लाटांचा यशस्वी प्रतिकार केला असून आता तिसर्‍या लाटेचे आव्हान देखील पेलण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केलेल्या छोटेखानी सत्कारानंतर भावना व्यक्त करतांना ना. पाटील यांनी श्री राऊत यांच्या कार्यकाळाचे कौतुक केले.

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा आज वाढदिवस. एका अधिकार्‍याने चांगले काम केले असता त्यांना जनतेचा किती भरभरून प्रतिसाद मिळतो हे आज दिसून आले. सोशल मीडियातून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले. याच प्रमाणे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी छोटेखानी कार्यक्रमात जिल्हाधिकार्‍यांचा सत्कार केला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्यासह मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर्स आणि अन्य सहकार्‍यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ना. पाटील म्हणाले की, शासन आणि प्रशासन हे दोन चाकांप्रमाणे असतात. यातील एखादे चाक जर इतराशी मॅच करत नसेल तर ती गाडी व्यवस्थित चालत नाही. मात्र जळगाव जिल्ह्यात विकासायात्रेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनरूपी चाकाची भरधाव वेग कारणीभूत ठरला आहे. आम्ही विविध योजनांच्या आखलेल्या संकल्पनांना जिल्हाधिकार्‍यांनी तत्परने कार्यान्वित केले आहे. आणि विशेष करून कोविडच्या काळातील त्यांचे कार्य ही अविस्मरणीय मानले जाणार आहे. यामुळे कधी काळी थोडा अडचणीत असणारा आपला जिल्हा कोरोनामुक्त झाला. आता तिसर्‍या लाटेची चाहूल लागत असली तरी याचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासन प्रमुख अभिजीत राऊत यांच्यासह यंत्रणा सज्ज झाली असल्याचे पालकमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.

Protected Content