जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महापालिकेतील गटनेतेपदाचा निर्णय आता विभागीय आयुक्त घेणार आहेत.
जळगाव महापालिकेत तत्कालीन भारतीय जनता पक्षात फूट पडून सत्तांतर झाले होते. यात बंडखोरांतर्फे नवीन गटनेता नेमण्यात आला होता. तर आधीचे गटनेते भगत बालाणी यांनी या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली होती. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झाली. यामध्ये दोन्ही गटांनी दाखल अपात्रतेच्या प्रलंबित प्रकरणांसह गटनेत्याचा निकाल दहा आठवड्यात देण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. भाजप व बंडखोर गटाच्या सर्व नगरसेवकांनी १७ ऑगस्टला विभागीय आयुक्तांकडे हजर राहण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
न्यायालयाच्या निर्णयामुळे आता नाशिक येथील विभागीय आयुक्त हे अपात्रता प्रकरण आणि गटनेतेपदाबाबत निर्णय घेणार आहेत. राज्यात नुकतेच झालेले सत्तांतर आणि बदललेल्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमिवर, विभागीय आयुक्तांचा निर्णय नेमका काय असेल ? याबाबत तर्क-वितर्क लावण्यात येत असून चर्चेला उधाण आले आहे.